सोलापूर : यंदा सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामात अत्यल्प पाऊस पडल्याने तो हंगाम वाया गेला आणि रब्बीही हातचा जाण्याची लक्षणे होती; मात्र कार्तिकी एकादशीच्या दरम्यान (१९-२० नोव्हेंबर २०१८) काही भागांत सलग दोन दिवस जोरदार पाऊस पडला. पाणी फाउंडेशनतर्फे आयोजित सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतलेल्या मोडनिंब गावासह परिसरातील सोलनकरवाडी, लोंढेवाडी, बैरागवाडी व उपळाई बुद्रुक या सात गावांत मोठा पाऊस झाला. स्पर्धेअंतर्गत या गावांत केलेल्या जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे पावसाचे पाणी वाहून न जाता साठवले गेले. त्यामुळे माढा तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.
खरीप हंगामाच्या पाठोपाठ रब्बी हंगामही वाया जाण्याची बिकट परिस्थिती उभी ठाकलेली असताना माढा तालुक्यातील काही गावांमध्ये सलग दोन दिवस मोठा पाऊस पडला. चारा पिकांसह महत्त्वाच्या ज्वारी पिकाला या पावसाचा चांगलाच फायदा झाला आहे. नुकतीच दिवाळी झाली असली, तरी दुष्काळामुळे या भागात फारसा उत्साह नव्हता; मात्र पाऊस पडताच या भागातील शेतकरी व ग्रामस्थांनी खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी केली.
या भागात जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. त्यामुळे पावसामुळे शेतशिवारात पडलेले पाणी वाहून न जाता मोठ्या प्रमाणात जमिनीतच मुरले. त्याचा उपयोग परिसरातील विहिरी, बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीत वाढ होण्यास होणार आहे. माढा तालुक्यातील २४ गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला होता. त्यापैकी मोडनिंबसह परिसरातील सोलनकरवाडी, लोंढेवाडी, बैरागवाडी व उपळाई बुद्रुक या सात गावांत उत्लेखनीय कामगिरी झाली आहे. या गावांत नुकत्याच पडलेल्या पावसाचे पाणी वाहून न जाता जलसंधारणाच्या उपाययोजनांमुळे साठून राहिले. हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. मधल्या काळात जलसंधारणाची कामे होऊनही पाऊसच पडला नसल्यामुळे पाणी साठले नव्हते. त्यामुळे सहभागी लोकांमध्ये प्रचंड निराशा आली होती; मात्र पावसाने त्यांच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
याबाबत पाणी फाउंडेशनचे माढा तालुका समन्वयक राजकुमार माने यांनी समाधान व्यक्त करून, या पावसामुळे लोकांचा उत्साह वाढल्याचे सांगितले. अंदाजे वीस हजार टँकर्स एवढे पाणी या भागात मुरले असावे, असे त्यांनी सांगितले. ‘जलसंधारणाच्या कामांमुळे आता वन्य जीवांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास तरी मिटला आहे,’ असे दुसरे समन्वयक सुशांत गायकवाड यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा डॉ. निशिगंधा कोल्हे म्हणाल्या, ‘पाणी फाउंडेशनतर्फे झालेल्या वॉटर कप स्पर्धेत जलसंधारणाची चांगली कामे झाली; मात्र पाऊसच पडला नसल्यामुळे आमची चांगलीच निराशा झाली होती. या पावसामुळे आम्हाला आता प्रचंड आनंद झाला आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीसुद्धा आम्ही पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग घेणार आहोत.’
(सोबत व्हिडिओ देत आहोत.)